Opinion

धरमवीर!

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

‘शोले’मधील जय-वीरू जोडी अखेर फुटली... धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा ‘याराना’ ५० वर्षांचा. धर्मेंद्रनेच ‘शोले’साठी अमिताभचे नाव सुचवले होते. ‘गुड्डी’ या चित्रपटाची नायिका जया भादुरी ही त्या चित्रपटात धर्मेंद्रची फॅन असते. वास्तव जीवनातही ती धर्मेंद्रची फॅनच होती. अमिताभ आणि घर्मेंद्र यांच्यातील मैत्र हे शेवटपर्यंत टिकले-अमिताभ हा व्यवहारी आणि धर्मेंद्र हा भावनिक किंवा इमोशनल असूनही... दोघेही राजकारणात शिरले आणि पस्तावले.

परममित्र राजीव गांधी यांच्या विनंतीवरून अमिताभ बच्चन राजकारणात आला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये झालेल्या निवडणुकीत अमिताभला अलाहाबादमधून काँग्रेसतर्फे उभे करण्यात आले. त्याने ६८%  मते मिळवून लोकदलाचे हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या विरोधात विजय मिळवला. बहुगुणा हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीदेखील राहिलेले होते. इंदिराजींच्या हत्येनंतर सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी निवडून आल्यानंतर तीन वर्षांनी अमिताभने लोकसभेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत व्ही. पी. सिंग निवडून आले. अमिताभनंतर चाळीस वर्षे अलाहाबादमध्ये काँग्रेसचा विजय झाला नव्हता. परंतु २०२४ साली काँग्रेसचे उज्ज्वल रमानसिंग यांनी भाजपचे नीरज त्रिपाठी यांचा अलाहाबादमध्येच ५८ हजार मतांनी पराभव केला.

 

 

अलाहाबादमधून निवडून आलेल्या राजकीय नेत्यांमध्ये दोन माजी पंतप्रधान, म्हणजे लालबहादूर शास्त्री आणि व्ही. पी. सिंग हे होते. त्याचप्रमाणे मुरलीमनोहर जोशीदेखील अलाहाबादमधून निवडून आले होते. राजकारणाच्या गटारगंगेत उतरून चूक केली, अशा आशयाचे उद्गार अमिताभने काढले होते. त्यानंतर अमिताभने राजकारणात कधी लक्ष घातले नाही. फक्त समाजवादी पार्टीचे मुलायम सिंग यांच्याशी त्याची मैत्री होती. त्यावेळी तो अडचणीत असल्यामुळे त्याला आधाराची गरज होती. अमरसिंग हे मुलायमसिंग यांचे सहकारी कम फिक्सर. तेदेखील अमिताभच्या मदतीस धावून गेले होते. नंतर मात्र अमरसिंग आणि अमिताभ यांचे बिनसले.

२००४ साली धर्मेंद्रला वाजपेयी व अडवाणींनी राजस्थानच्या बिकानेरमधून उभे राहण्याची विनंती केली. त्याअगोदर तेथे दोनवेळा काँग्रेसचा विजय झाला होता. धर्मेंद्रच्या वलयामुळे तेथे विजय मिळवता येईल, हा भाजपचा आडाखा योग्य ठरला. धर्मेंद्र ६० हजार मतांनी जिंकला. मात्र खासदार म्हणून त्याची कारकीर्द अयशस्वी ठरली. मतदारसंघातून त्याच्यावर टीका झाली होती. संसदेतही तो दिवसेंदिवस गैरहजर राहत होता. राजकारण हा आपला पिंडच नसल्याची कबुली नंतर त्याने दिली आणि ती वाटच सोडली. मात्र भाजपत असला, तरी तो सेक्युलरच होता. मी फक्त माणुसकी हा धर्म मानतो, असे तो सर्व धर्मांच्या लोकांना सांगत असे.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय चित्रपटसृष्टीवर पहिली काही वर्षे दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. १९६०चे दशक शम्मी कपूरने, सत्तरच्या दशकाच्या आगेमागे सुपस्टार राजेश खन्ना आणि त्यानंतर अमिताभ बच्चनने लाखो तरुण-तरुणींची मने जिंकली. परंतु मुख्यतः दिलीपकुमारच्या प्रेमात असलेल्या धर्मेंद्रने १९६० साली हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करून, किमान ३५ वर्षे नायक म्हणून लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आणि त्यानंतरही चरित्र अभिनेता म्हणून तो टिकून राहिला. देखणेपणाच्या बाबतीत देव आनंदनंतर धर्मेंद्रचाच क्रमांक लागतो. १९५०-६०च्या दशकांत स्टंटपट किंवा सी-ग्रेड चित्रपट मोठ्या संख्येत बनत असत आणि त्यामध्ये दारासिंग, रंधावा यासारखे पहिलवान नट काम करत असत. परंतु मुख्य धारेतील आणि पहिल्या वर्गातील चित्रपटसृष्टीत धर्मेंद्रसारखी शरीरसंपदा असलेला नट झाला नाही.

 

 

पंजाबमधील गावखेड्यात वाढलेल्या धर्मेंद्रच्या व्यक्तिमत्त्वात एक गावरान रगेलपणा होता. पंजाबी जाट कुटुंबात जन्म झाला असल्यामुळे धर्मेंद्र तसा परंपरावादी होता. दिलीपकुमारचे चित्रपट बघून तो अत्यंत प्रभावित झाला होता. ‘फिल्मफेअर’च्या एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो मुंबईत आला होता. त्यात निवड झाल्यानंतरही त्याला सुरुवातीला कोणतेही काम मिळाले नाही. त्यामुळे तो पंजाबला परतला. परंतु पुन्हा एकदा त्याला मुंबईतून एका निर्माता सुबोध मुखर्जी यांनी बोलावून घेतले. मात्र त्यांच्या ‘लव्ह इन सिमला’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आर. के. नय्यर यांनी धर्मेंद्रला बघून ‘आम्हाला नायक हवा आहे, फुटबॉलपटू नव्हे’, असे म्हणून त्याला परत पाठवले. त्यानंतर स्टुडिओच्या चकरा मारण्यात काही काळ गेल्यावर धर्मेंद्रला ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ हा चित्रपट मिळाला. मात्र सुरुवातीच्या काही चित्रपटांत धर्मेंद्रने दुय्यम वा नकारात्मक भूमिकादेखील केल्या. शम्मी कपूरच्या ‘बॉयफ्रेंड’ या चित्रपटातला पोरगेलासा धर्मेंद्र ओळखूदेखील येत नाही. ‘आयी मिलन की बेला’ या चित्रपटाचा नायक राजेंद्रकुमार होता आणि धर्मेंद्र त्यात खलनायक होता.

‘फूल और पत्थर’ या चित्रपटातील शाका या गुंडाच्या भूमिकेत धर्मेंद्रने प्रथमच आपली ओळख निर्माण केली. आयी मिलन की बेला, आये दिन बहार के, मेरा गाँव मेरा देश, शिकार आणि समाधि या चित्रपटांमध्ये धर्मेंद्रची आशा पारेखबरोबरची जोडी जमली. लोफर, दो चोर, राजा जानी, कहानी किस्मत की अशा अनेक चित्रपटांतून त्याने शहरी, चलाख नायकाच्या भूमिका केल्या. ‘प्रतिज्ञा’ या चित्रपटात धर्मेंद्र हा अशिक्षित ट्रक ड्रायव्हर असतो आणि परिस्थितीमुळे त्याला इन्स्पेक्टरच्या भूमिकेत जावे लागते. या सिनेमात धर्मेंद्रने हास्य अभिनयाची आपली अनोखी अदा पेश करून तुफान लोकप्रियता संपादन केली. त्यातील ‘मैं जट यमला पगला दीवाना’ या गाण्यातील धर्मेंद्रचा डान्स इतका लोकप्रिय झाला होता की, एका रिॲलिटी शोमध्ये हेमा मालिनीनेही त्याची नक्कल करून दाखवली होती...

 

 

‘तुम हसीं मैं जवाँ’ या चित्रपटापासून हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी जवळपास तीसेक चित्रपटांतून नायक-नायिका म्हणून काम केले. राज कपूर-नर्गिस या जोडीप्रमाणेच प्रेक्षकांची पडद्यावरील ही मनपसंत जोडी होती. धर्मंद्रने हेमाबरोबर विवाह केला आणि तो कधी लपवूनही ठेवला नाही. हे दोघेही पुढे राजकारणातही आले. हकीकत हा युद्धपट किंवा धर्मवीर, रझिया सुलतान, सल्तनत यासारख्या पोशाखीपटांत आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे धर्मेंद्र शोभून दिसला. मात्र धर्मेंद्रला अभिनेता म्हणून खरे व्यक्तिमत्त्व बहाल करून दिले, ते बिमल रॉय आणि हृषीकेश मुखर्जी यांनी. बंदिनी, अनुपमा, सत्यकाम, गुड्डी, चैताली, चुपके चुपके या चित्रपटांमधील धर्मेंद्रचा अभिनय अत्यंत सहज आणि उत्स्फूर्त आहे. या चित्रपटांतील धर्मेंद्रच्या व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आणि ठसठशीत आहेत.

अभिनय कशाशी खातात, याची कल्पनाही नसलेला धर्मेंद्र बिमलदा आणि हृषीदांच्या चित्रपटांत मनाला अधिक स्पर्श करून जातो. ‘गुड्डी’मध्ये धर्मेंद्रने ‘धर्मेंद्रची’च भूमिका केली होती आणि त्यात ‘आजकाल राजेश खन्नाचा जमाना सुरू झाला आहे’, असा संवादही त्याच्या तोंडी आहे! शोले, राम बलराम, चुपके चुपके या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र आणि अमिताभने कमालीचा आणि धमालीचा अभिनय केला आहे. ‘शोले’साठी अमिताभचे नाव धर्मेंद्रनेच सुचवले होते. राजेंद्रसिंग बेदी यांच्या ‘फागुन’ या चित्रपटात वहिदा रेहमानसारख्या कसलेल्या अभिनेत्रीसह काम करताना धर्मेंद्र कुठेही कमी पडला नाही. मल्टिस्टारर चित्रपटांचा जमाना सुरू झाल्यावर धर्मेंद्रने अशा चित्रपटांतही स्वतःची एक जागा निर्माण केली. लेखक, सैनिक, पोलीस ऑफिसर, शेतकरी, इंजिनियर, कैदी अशा कोणत्याही भूमिकेत धर्मेंद्र शोभून दिसायचा. अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नसूनही, त्याने आपण एक बऱ्या दर्जाचा अभिनेता आहोत, हे सिद्ध करून दाखवले.

राजेंद्रकुमार, मनोजकुमार, विश्वजित, जॉय मुखर्जी यासारखे अनेक नट फार वर्ष टिकले नाहीत. परंतु धर्मेंद्र कैक वर्षे नायक म्हणून आणि नंतर चरित्र अभिनेता म्हणून टिकून राहिला. धर्मेंद्रने आपल्या मुलांसाठी का होईना, पण चित्रपटनिर्मिती सुरू केली आणि सनी देवल वा बॉबी देवल हे नायक म्हणून पुढे प्रस्थापित झाले. लाइफ इन अ मेट्रो, जॉनी गद्दार, रॉकी और रानी की प्रेम कहानी हे गेल्या काही वर्षांतील धर्मेंद्रचे गाजलेले चित्रपट. ‘यमला पगला दीवाना’ या चित्रपटाचे तीन भाग त्याने सादर केले. भरपूर पैसा कमावल्यानंतरही धर्मेंद्रने स्वतःचे साधेपण टिकवून ठेवले. मुंबईतदेखील आपल्या भावांच्या कुटुंबांसमवेत एकत्र कुटुंबात तो राहत असे. धर्मेंद्र आपली मुळे कधी विसरला नाही. तरीही तो सतत काळाबरोबर राहिला. धर्मेंद्रला शेरोशायरीचा नाद होता आणि अनेक शेर त्याला पाठ होते. तो स्वतःही शेर करायचा. अत्यंत खुल्या व मोकळ्या मनाने आणि दिलदारपणे कसे वागावे आणि जगावे, हे धर्मेंद्रकडे पाहून समजते. पंजाबच्या या यमला जटाला जिवंतपणी माध्यमांनी मारलेदेखील होते. परंतु शेवटी प्रत्येक जन्माची अखेर ही होतच असते. बाहेरून पोलादी असलेला धर्मेंद्र आतून हळवा होता. धर्मेंद्रच्या जाण्यामुळे एका जिंदादिल जीवनाची अखेर झाली आहे.